ठाणे : 'बाळ गोपाळ मित्रमंडळा'च्या वतीने आठ ऑगस्ट रोजी शिवाजी मैदानावर `हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव २०१७'चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला १५ शाळांमधील ६२७ विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सहकारी, कर्मचारी यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, अशी माहिती महोत्सवाचे आयोजक विलास ढमाले यांनी दिली.
प्रारंभी जैन धर्मगुरु जे. पी. गुरुजी यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून महोत्सवास प्रारंभ करण्यात आला. खासदार राजन विचारे यांनी या उत्सवात सहभागी होऊन दिव्यांग मुलांना प्रोत्साहन दिले. अवयवदान चळवळीचे प्रणेते विलास ढमाले यांच्यासह रंगारी, डॉ. मुकेश शेट्टे, डॉ. गुंजोटीकर, डॉ. हर्षद भोळे, डॉ. विद्या कदम, डॉ. अमित नाईक, डॉ. देढीया तसेच विजय सिंह, अमित टण्णू, अनिल उसपकर, हेमंत तांबटकर, सुरेश यादव आदी या वेळी उपस्थित होते.
'उमेद फाऊंडेशन'च्या उर्दू शाळेतील दिव्यांग मुलांचा सहभाग हे यंदाच्या महोत्सवाचे वैशिष्ट्य. याच शाळेतील अंध मुलगा शोएब या विद्यार्थ्याला हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी फोडण्याचा मान मिळाला. सर्व सहभागी शाळांना रोख पारितोषिक, चषक देण्यात आले. उपस्थित मान्यवर डॉक्टरांच्या हस्ते ही पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. उपस्थितांमधील १२४ जणांनी अवयवदानाचे फॉर्म भरून या उपक्रमाला हातभार लावला.
या दहीहंडी महोत्सवाचे यंदा २६वे वर्ष होते. यापूर्वी हा उत्सव ठाण्याच्या बाजारपेठेत `महासरस्वती दहीहंडी उत्सव' म्हणून १२ वर्षे साजरा केला जात होता. त्यानंतर हा उत्सव `हिंदुहृदयसम्राट हृदयस्पर्शी अवयवदान दहीहंडी उत्सव' म्हणून साजरा करण्यास सुरूवात झाली आणि यंदा `हिंदुहृदयसम्राट अवयवदान दिव्यांग दहीहंडी महोत्सव' म्हणून साजरा करण्यात आला. यंदा अवयवदान दहीहंडी उत्सवाचे १४वे वर्ष होते.
या उत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची थर लावण्याची स्पर्धा नसते. दिव्यांग मुलांच्या जीवनात जिद्द निर्माण व्हावी याकरिता तसेच, अवयवदानाबद्दल जनजागृती व प्रसार व्हावा यासाठी दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.